कविता : व्याकूळ
विजो (विजय जोशी)
बेभान वाहे सुसाट्यात वारा हवा कोरडी वाहते धावते,
आकाश आहे निरभ्री विराणी मनाला अताशा भिती वाटते
कित्येक हंगाम पाऊस नाही मनाच्या तळाशी झरे कोरडे,
संपेल दुष्काळ माहीत नाही किती वाट पाहू तुझी सांग रे
भेगाळली शेतमाती अभागी अशी खिन्न आतर्क्य शोकांतिका,
होईल वर्षाव आता तरी का? असा प्रश्न आहे मनी चातका
गेले तसेही किती वांझ सारे असे पावसाळे किती भोगले,
पाहू नको अंत आता असा तू दुराव्यात मी पोळले सोसले
कित्येक आले असे पावसाळे परी हा निराळा उरी लागला,
सोडून दे तू वृथा राग सारा तुला भेटण्या जीव व्याकूळला
■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२





0 Comments: